Pages

Monday, May 31, 2010

भाडे मीटर प्रमाणे (न) देणे

"भाडे मीटर प्रमाणे देणे" असं रिक्ष्याच्या मीटर वर लिहिलेले असतं. किती लोक ते पाळतात हा चर्चेचा विषय होऊ शकतो. आत्तापर्यंत पुण्यात राहत असल्यामुळे पुणेरी रिक्षा चालक हे सर्वात जहाल असतात असा मला वाटत होत. पण पुणेरी रिक्षाचालकांच्या मग्रुरिला आणि अव्वाच्या-सव्वा भाडे आकारण्याच्या प्रवृत्तीला इथले म्हणजे बंगलोर मधले रिक्षाचालक सह्ज आव्हान देऊ शकतील. त्यांच्यासमोर मला आता पुण्यातले रिक्षाचालक अगदीच मवाळ वाटायला लागले आहेत. 

बंगलोर मध्ये नवीन आलेला माणूस म्हणजे यांच्यासाठी पर्वणीच असते. काय वाट्टेल ते दर तोंडावर फेकतात. दिवसा सुद्धा मीटर प्रमाणे रिक्षा चालवत नाहीत. रात्री आठ नंतर लगेच दुप्पट भावाने दर आकारतात. 

इकडे एक नवीनच गोष्ट कळली! इथले रिक्षावाले  दिवसाढवळ्या सुद्धा सर्रास "रिटर्न भाडे" मागतात. म्हणजे आपण त्याना म्हणालो की "बाबा (अप्पा) इथे इथे जायचे आहे. किती होतील? तर तिथे जायचे २० रु. होत असतील, तरी हा पठ्ठ्या ४० रु. म्हणणार. का तर तिथून हा "विदाऊट पाशिंजर" कसा येणार म्हणे ? (अरे पण मग इथे येऊ नकोस ना! तिथेच एखाद गिराहिक शोध! पण नाही !!!) आता हा तिथून विदाऊट पाशिंजर येऊ शकत नाही म्हणून तो भुर्दंड गिराहिकाने का सोसायाचा? आणि ते सुद्धा दिवसाढवळ्या! बर दुसरा कोणी आजूबाजूचा रिक्षावाला बघावा तर सगळे एकाच माळेचे मणी! आपण भाव ठरवायला लागलो तर म्हणतात "चौदा रुपयेमे हमको क्या मिलेगा साब?" पण मग नुसतं रिक्षा थांब्यांवर बसून तरी रांडेच्याना काय मिळणार आहे?

संध्याकाळी तर अगदी कमीत कमी अंतरासाठी सुद्धा जिथे १४ रु हा दर आहे तिथे यांच्या डोंबल्यावर ३० रु. द्यावे लागले आहेत मला. राउंड ऑफ करण्याची पद्धत तर केवळ चीड आणणारी आहे. ट्रॅफिक जाम होत, लगेज आहे, पत्ता अचूक सांगितला नाहीत, सुट्टे नाहीत ई. कारणांमुळे इथे १४ रु. झाले असतील तरी २० रु. टिकवावे लागतात. (आणि इथे प्रश्ना पैशाचा नाही तर तत्वाचा आहे. असो ते ह्यांना काय कळणार. कप्पाळ!)

जरा शहराबाहेर गेलात तर मग विचारायची सोय नाही. रिक्षा करण म्हणजे शान्तं पापं! इकडे बससेवा मात्र उल्लेखनीय आहे. पण तरी सगळिकडेच बसने जाता येत नसल्यामुळे, आपण अगदी हरि नसलो तरी या "गाढवांचे पाय" धरणे क्रमप्राप्त आहे.